नगर : भारतीय स्टेट बँकेच्या नगरमधील पहिल्या शाखेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बँकेचे जुने व मोठे ग्राहक तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व सेवानिवृत्तांचा बँकेचे महाराष्ट्राचे महाप्रबंधक राजेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बँकेच्या शंभर वर्षांतील प्रगतीच्या कार्याचा आलेख दर्शवणाऱ्या हेरिटेज बोर्डह्णचे अनावरण करण्यात आले.

स्टेट बँकेच्या नगरमधील पहिल्या शाखेला यंदा १०० वर्ष पूर्ण होत आहेत. शतक महोत्सवाबद्दल मुख्य शाखेत आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रचे महाप्रबंधक राजेश कुमार व जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी उप महाप्रबंधक रविकुमार वर्मा (औरंगाबाद), लघु व मध्यम उद्योग विभागाचे उपप्रबंधक सूरज यामयार, क्षेत्रीय व्यवस्थापक विनोद कुमार, निवृत्त उपप्रबंधक दिगंबर वाघमारे, इंद्रजित थोरात, कुंडलिक चौधरी व मुख्य शाखेचे प्रबंधक अजय कुमार आदींसह बँकेचे ग्राहक, माजी अधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या बँकेने १०० वर्ष पूर्ण करणे सोपी बाब नाही. अनेक बँका आल्या व गेल्याही, मात्र स्टेट बँक अव्वल स्थानावर आहे. गेल्या १०० वर्षांत या शाखेची नगरच्या जडण घडणीत महत्त्वाची भूमिका आहे. बँकेचे ग्राहक, माजी अधिकारी व कार्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच बँक या स्थानी पोहचली असे महाप्रबंधक राजेश कुमार म्हणाले. रावसाहेब वर्पे यांनी स्टेट बँकेला शुभेच्छा दिल्या. रविकुमार वर्मा म्हणाले, राष्ट्रनिमार्णात बँकेचे मोठे योगदान आहे. येणाऱ्या काळातही नगरची शाखा अविरतपणे ग्राहकांच्या विश्वासावर उभी रहात राज्यात अव्वल राहील. मुख्य शाखेचे प्रबंधक अजय कुमार यांनी बँकेच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक वर्षां अष्टेकर यांनी केले. वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप फंड यांनी आभार मानले. शिंगवे नाईक येथील माउली संस्थेस पाणी शुध्दीकरण यंत्र भेट देण्यात आले.