जालना: भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय. जिल्हयातील खरिपाचे क्षेत्र ६ लाख १९ हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात सिंचन सुविधा असलेली शेती १८ टक्के आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथे ५ लाख ३५ हजार जण शेतीशी निगडित आहेत. त्यापैकी ७६ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक. खरिपातील निम्मे क्षेत्र कापसाखाली तर ३० टक्के क्षेत्र सोयाबीनचे असते. तुतीची लागवड करून त्यावर रेशीम कोष उत्पादन घेण्यात जालना जिल्हा राज्यात अग्रेसर असून रेशीम कोष खरेदी-विक्रीची बाजारपेठ जालना बाजार समितीच्या परिसरात आहे.
६५ शाखा असणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही येथील प्रमुख बँक असून, ग्रामीण बँक आणि वर्गीकृत बँकांच्या ११५ पेक्षा अधिक शाखा जिल्ह्यात आहे. या बँकांतील कर्जाचे प्रमाण ठेवीच्या तुलनेत ११० टक्के आहे . मुद्रा कर्ज वितरणात २०१८ ते २०२४ या काळात राज्यात जिल्ह्याच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत जिल्ह्यातील जनधन खात्यांची संख्या ८ लाख १५ हजार होती. जिल्ह्यात एक लाख लोकसंख्येमागे ८५ प्राथमिक तर ३९ माध्यमिक शाळा आहेत. तर १ लाख ४२ हजार लोकसंख्येमागे एक रुग्णालय आहे. प्रत्येक शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळामागे रस्त्यांची लांबी ११३ किलोमीटर आहे.
सळ्या उत्पादनात आघाडी
बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या उत्पादित करणाऱ्या उद्याोगाचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. राज्याबाहेरूनही याला मागणी आहे. येथील औद्याोगिक वसाहतीत या उद्याोगाची अब्जावधींची उलाढाल आहे. गेल्या चार-पाच दशकांत या उद्याोगाचा विस्तार झाला आहे.
जिल्ह्यातील २० टक्के लोकसंख्या शहरी भागातील आहे. राज्यात मानवविकास निर्देशांकात (२०११ ची आकडेवारी) जालना जिल्हा २८ व्या क्रमांकावर आहे. मोसंबी उत्पादनातही जिल्हा अग्रेसर असून त्यास भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.
जिल्ह्यातील ७५ टक्के रोजगार कृषी क्षेत्रातून येतो. शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी पूर्वीपासून राज्यभरात जालना शहराची ओळख आहे .स्वातंत्र्यानंतर बियाणे उद्याोगातील बदलाचे देशातील एक प्रमुख केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
दृष्टिक्षेपात जिल्हा
● भौगोलिक क्षेत्र –
७ लाख ७२ हजार हेक्टर,
● लागवड क्षेत्र –
६ लाख ७६ हजार हेक्टर
● सिंचन क्षेत्र –
१ लाख २४ हजार हेक्टर,
● महानगरपालिका- १,
● नगर परिषदा- ३,
● पंचायत समित्या- ८,
● एकूण गावे – ९७०
● लोकसंख्या (२०११ नुसार) १९ लाख ५९ हजार
● दरहजारी पुरुष-स्त्री प्रमाण (२०२३-२०२४) – ९३७