ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या नुकसानीचा राज्यभरात आढावा घेत आहेत. औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी केली आहे. पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच खरे मुख्यमंत्री कोण? असा मिश्किल सवाल आदित्य ठाकरेंनी केला. “आम्ही केवळ बांधावर जात नसून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जाहीर करतो” असं विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. “ज्यांच्या शेतात दोन-दोन हेलिपॅड आहेत ते तसं बोलू शकतात”, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.
यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्याच्या कृषीमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “उद्योगमंत्री आणि कृषीमंत्री महाराष्ट्राला आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठा घोळ होत आहे. उद्योग जगतात गुंतवणूक होत नाहीय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. म्हणूनच या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. मात्र, लाज न बाळगता ते राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत”, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची गावी शेतात शिवारफेरी आणि मशागत ; ग्रामस्थांशी संवाद
ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी करा, मी मात्र शेतकऱ्यांशी भेटणार, असेही ते यावेळी म्हणाले. “ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. राज्यभरात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, मात्र कोणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही”, असा आरोप ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळीराजाच्या भूमिकेत; गावाकडील शेतात रमले
सातारा दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडून शेतीची मशागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या गावी दोन दिवस मुक्कामी होते. यावेळी त्यांनी शेतीतील उभ्या पिकात शिवारफेरी करत मशागत केली. मुख्यमंत्र्यांनी शेतात स्ट्रॉबेरीसह गवती चहा, हळद, हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केली. शेतातील कामं आटोपुन मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत गावकऱ्यांसोबत संवाद साधला. तसंच त्यांच्या शेतात असलेल्या गवती चहाच्या पिकासह आंब्याच्या बागेची पाहणी केली.