अहिल्यानगर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत कृषी सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या आहेत. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या तसेच तपासणीत त्रुटी आढळल्याने दोषी ठरलेल्या एकूण २७ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच कपाशीच्या बियाणांच्या विक्रीत गैरव्यवहार केल्याच्या कारणातून नेवासा व पाथर्डी येथील दोन विक्रेत्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन व नेवासा तालुक्यातील दोन अशा तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या तपासणीत कृषी सेवा केंद्रातील विविध त्रुटी उघड झाल्या आहेत. यामध्ये भावफलक व साठा फलक न लावणे, विक्री परवाने दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्ययावत न ठेवणे, स्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे, टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसणे, खतांची विक्री पॉस मशीन वापरून न करणे अशा विविध त्रुटी आढळल्या आहेत. सुरुवातीला या कृषी सेवा केंद्रांना नोटीस देऊन त्यांची सुनावणी घेण्यात आली, बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या सुनावणी दरम्यान दोष सिद्ध झाल्यानंतर अशा २४ केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय विक्री परवानगी घेतली असतानाही दुकाने बंद ठेवणाऱ्या केंद्रांवरही मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आले आहे.

या कारवाईत राहुरीतील ४, अकोल्यातील ६, नेवासातील ५, शेवगावमधील ३ व पाथर्डीतील ३ व अहिल्यानगर ३ अशा एकूण २४ विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कठोर कारवाईचा इशारा

खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.-सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.