लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर (५०) आणि अक्षय पेंडसे (३३) यांचे मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावानजीक रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर टेंपोचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष याचाही मृत्यू झाला आहे. एका कार्यक्रमाचे चित्रकरण संपवून ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज (सोमवार) दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे विद्यापीठाच्या आवारात आगामी `कोकणस्थ` चित्रपटाचे रविवारी चित्रीकरण झाले. ते संपवून रात्री नऊच्या सुमारास सर्वजण कोथरूड येथील घरी गेले. त्यानंतर मुंबईला परतत असताना पुण्याला जाणारा टेंपो रस्ता दुभाजक तोडून अभ्यंकर असलेल्या मोटारीवर जाऊन धडकला. या भीषण अपघातात अक्षय पेंडसे यांचा जागीच मृत्यू झाला. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसें यांची पत्नी दिप्ती आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने निगडी येथील जवळच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अभ्यंकर आणि पेंडसेंच्या मुलाचा मृत्यू झाला. पेंडसे यांची पत्नी दीप्ती तसेच अभ्यंकर यांचा मोटार चालक किरकोळ जखमी झाले.
आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. ‘शुभंकरोती’, ‘या गोजीरवाण्या घरात’ या त्यांच्या गाजलेल्या भूमिका असलेल्या मालिका होय. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होते.
अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, ‘मिस्टर नामदेव म्हणे’ हे व्यवसायिक नाटक आणि ‘उत्तरायण’ चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या.  
या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील आणखी दोन महत्वाचे कलाकार काळच्या पडद्याआड गेले आहेत. सध्या झी मराठी या टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या ‘मला सासू हवी’ या लोकप्रिय मालिकेत आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे अतिशय महत्वाच्या भूमिका साकारत होते.

चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या प्रतिक्रिया;
अभिनेता सुशांत शेलार – ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या ई टीव्ही मराठीवरील मालिकेत आम्ही एकत्र काम केले होते. खरे सांगायचे तर आनंद अभ्यंकर यांच्याविषयीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत.  सेटवर केलेल्या गमतीजमती तर आहेतच. परंतु, आता या क्षणी शब्दच फुटत नाहीयेत. दैवगतीचा हा फेरा आहे एवढे मात्र खरे.

अभिनेत्री वंदना गुप्ते – अतिशय गुणी कलावंत होता. ‘मातीच्या चुली’ या चित्रपटात सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या जागी आनंद अभ्यंकरने काम केले. आता आनंदची जागा कोण भरून काढणार?

दिग्दर्शक शिरीष राणे – आता आपण दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह इन रिलेशनशिप’ या नाटकाचे प्रयोग सुरू होणार होते. आनंदला मध्यवर्ती ठेवूनच निरंजन ही व्यक्तिरेखा लिहिलेली होती. परंतु, आता त्या नाटकाचे काय करायचे हा प्रश्नच पडला आहे. माझ्या ‘मरेपर्यंत फाशी’, ‘जन्म’ या चित्रपटांबरोबरच जवळपास प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आनंदने काम केले होते. आमची चांगली मैत्रीही होती. त्याला डोळ्यासमोर ठेवूनच नाटक लिहिले होते. आनंद अतिशय सहृदय व महान माणूस, तितकाच घनिष्ठ मित्र, उत्कृष्ट सहकलावंत आणि मित्र होता.

अभिनेता स्वप्नील जोशी ट्विटरवर म्हणतो, आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन झाले यावर माझा विश्वासच बसत नाहीये अजूनही.

दिग्दर्शक अमोल शेटगे म्हणाला, दोन्ही कलावंतांच्या अचानक निघून जाण्याने अवघ्या मराठी चित्रपट-नाटय़-टीव्ही मालिका सृष्टीलाच धक्का बसलाय. त्यांची कायम आठवण येत राहील.

अभिनेता शरद केळकर ट्विटवरवर म्हणाला की, आम्हा सर्वानाच जबरदस्त धक्का बसलाय. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.