लोकसत्ता वार्ताहर

पंढरपूर : ऐन माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रातील पाण्यात शेवाळे, जलपर्णी,घाण झाले होते. ही परिस्थिती निदर्शनास आणून देणारे वृत्त लोकसत्ताने आज प्रकाशित करताच प्रशासनाने तातडीने स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. येथील जुना दगडी पुलावरील बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले. भाविकांनी नदी पात्रात निर्माल्य, कपडे, आदी वस्तू टाकू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले.

वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी माघी वारी. या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच एकादशी ८ फेब्रुवारी रोजी आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक राज्यातून दर्शनासाठी येतात. मात्र येथील चंद्रभागा नदी पात्र अस्वछ आणि घाण झाले होते. या संदर्भात लोकसत्ताने बातमी लावली. या बाबत उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून गुरसाळे व नगर परिषदेच्या बंधारे मधून तातडीने सहा दरवाजे उघडून नदी पत्रामध्ये पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्या नुसार गुरसाळे बंधाऱ्यातून व नगर परिषदेच्या बंधार्‍यामधून भाविकांचे सोयीसाठी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडून चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ज्या ठिकाणी घाण, कपडे, हार, फुले आहेत ती घाण पालिकेच्या कर्मचाऱयांनी काढली. तसेच नदीपात्रामध्ये सध्या पाण्याची रिसायकलिंग करून पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सदरची यंत्रणा आषाढी यात्रेपूर्वी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. असे असले तरी प्रशासनाने तातडीने पावले उचलीत नदी पात्र स्वच्छ झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे