Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या विधानावरून कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून एक विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर आता कृषीमंत्री कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिकमध्ये पाहणी करत असताना कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का?, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठली. यानंतर अखेर कृषीमंत्री कोकाटे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या शब्दाचा वेगळा अर्थ घेतल्याचं कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

“सध्या शेतात कपाशी नाही, सोयाबीन नाही. आता फळबागा उभ्या आहेत आणि अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण माझ्या शब्दाचा अर्थ तुम्ही वेगळा घेता त्याला मी काय करू? आता ज्या शेतात काहीही नाही तेथील पंचनामे करून काय करणार? पण काद्यांच्या बाबतीत पंचनामे करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेलं आहे त्या-त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

“तसेच अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके आहेत त्यांना माझं वक्तव्य वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके नाहीत त्याचे पंचनामे कसे करणार? त्यामुळे जे खरं आहे तेच बोललो. शब्द चुकला असेल पण माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

कृषीमंत्री कोकाटे यांचं विधान काय होतं?

“कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? असा सवाल करत ढेकळांचे पंचनामे करायचे का”, असा सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला होता. तसेच घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असं कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री कोकाटेंनी कर्जमाफीबाबतही केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कर्जमाफीच्या मुद्यांवरून त्यांनी शेतकऱ्यांना सुनावलं होतं. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता?”, असं कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं होतं.