राहाता: कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतच्या वर्गांना तीनच शिक्षक असल्याने सोमवारपासून पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली नव्हती. मंजूर शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याने विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांनी शाळा भरवली होती.

पालकांच्या या आंदोलनानंतर शाळेला एका पदवीधर शिक्षकाची व्यवस्था करण्यात आली. सप्टेंबरनंतर दुसऱ्या मंजूर शिक्षकाची नेमणूक करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेत मुलांना शाळेत पाठविले.

मनेगाव जिल्हा परिषद शाळेत १ ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत. १ ते ५ वीपर्यंत ८१ विद्यार्थी, तर ६ वी व ७ वीच्या वर्गात २५ विद्यार्थी आहेत. वर्षापूर्वी सहावी व सातवीला दोन शिक्षक मंजूर होते, त्यातील एक शिक्षक पदोन्नतीने बदलून गेले. त्यामुळे वर्गांसाठी एकच शिक्षक शिल्लक राहिला. मात्र, नवीन बदल्यांमध्ये तो एक शिक्षकही बदलून गेल्याने या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकच राहिला नसल्याने पालकांनी एकत्र येत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तत्पूर्वी शाळेत शिक्षक नसल्याची माहिती पालकांनी प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांना दिली होती. पालकांसमवेत विस्तार अधिकारी वाकचौरे व केंद्र प्रमुख लांडे यांनी बैठक घेतली. एक पदवीधर शिक्षक देण्याचे त्यांनी आश्वासन दिले, तर शेख यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.

हक्काचे दोन शिक्षक मिळालेच पाहिजे या मागणीवर पालक ठाम राहिल्याने कोंडी कायम राहिली होती. मात्र, आता एक शिक्षक हजर झाल्याने पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली. शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोल्हे, सरपंच अण्णासाहेब गांगवे, सुखलाल गांगवे, मच्छिंद्र गोऱ्हे, भगिरथ झिंजुर्डे, जनार्दन गोऱ्हे, अमोल गोऱ्हे, संतोष गांगवे, शहाजी झिंजुर्डे, सोमनाथ झिंजुर्डे, योगेश कालेवार, एकनाथ जाधव, मच्छिंद्र आढाव, दिलीप आढाव, हिरामण आढाव, पोपट आढाव, बाळासाहेब आढाव, प्रकाश कालेवार, संपत मोरे, विशाल माळी, दीपक कोल्हे, सागर गोधडे, साईनाथ जाधव, नवनाथ जाधव, मनोज लहामगे आदी पालक उपस्थित होते.