मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावलाय. ते वर्धा जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचे ‘ते’ ट्वीट म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी”; अमोल मिटकरींची टीका

“उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या काय आहेत? काय अडचणी आहेत हे कसे समणार. अजूनही काही भागात पाऊस सुरु आहे. पंचनामे करताना घराची फक्त भिंत ओली झाली असून घर तर तसेच आहे, असे म्हटले जात आहे. पण भिंती सुकल्यानंतर भेगा पडून घर पडू शकते. आम्ही प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिलं,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> अर्जुन खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला? दिल्लीत श्रीकांत शिंदेंची भेट; म्हणाले “पुढील दोन दिवसात…”

“काही भागात गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. काही काम सामाजिक संस्थांनी करावे, काही काम सीएसआरमधून करावे. आम्ही सर्व जाबाबदारी राज्य सरकारवर ढकलणार नाही. आम्हीदेखील बराच काळ सरकारमध्ये काम केलेले आहे,” अजे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पंचनामे सुरु आहेत. लवकरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राज्य सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे फडणवीस गुरुवारी (२८ जुलै) म्हणाले होते.