राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकी चितळेने केलेल्या पोस्टवरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही अशाप्रकारच्या आक्षेपार्ह भाषेच्या वापराला विरोध केला आहे. असं असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : पवारांविरोधातील आक्षेपार्ह मजकूराबद्दल फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अलिकडच्या काळात…”

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
jitendra awhad Prakash Ambedkar (1)
“…तर पुढची पिढी माफ करणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचा प्रकाश आंबेडकरांना टोला; म्हणाले, “संविधानाविरोधात…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

अजित पवार हे आज सांगलीत आहेत. या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना अनेक विषयांवरुन प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये शरद पवारांवर केतकी चितळेने केलेल्या टीकेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. सुहास कदम यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात बोलणाऱ्यांना शोधा आणि फोडून काढा, असं आवाहन केलं आहे. याचसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलं असता त्यांनी संतापलेल्या स्वरामध्ये सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.

संविधानाने अधिकार दिलाय पण…
“हे योग्य वाटतं नाही. हा काही पक्षाने काढलेला फतवा नाहीय”, असं अजित पवारांनी पत्रकारांना सुहास कदम यांच्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आलं असता सांगितलं. “काही व्यक्ती विकृतीमधून काही बोलत असतील तर विनाश काले विपरित बुद्धी, असं एका वाक्यात सांगता येईल. पण बोलणाऱ्यांनी आपल्याला संविधानाने, कायद्याने, घटनेनं अधिकार दिलेला आहे. परंतू तो अधिकार देत असताना आपण काय वक्तव्य करावं आणि त्या वक्तव्याचा समाजामध्ये वातावरण खराब होणार नाही (याची काळजी घेतली पाहिजे),” असं अजित पवार म्हणाले.

आदर्श आणि राजकीय प्रवास…
पुढे बोलताना, “प्रत्येक व्यक्ती कुणाला ना कुणाला मानणारी असते, कुणाला ना कुणाला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवणारी असते. पवारसाहेबांची राजकीय कारकिर्द आपल्याला माहितीय. ६० वर्षांची त्यांची राजकीय कारकिर्द आहे. ६० वर्षांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये चांगला विचार मांडण्याचं काम करायचं. चार चार वेळा मुख्यमंत्री व्हायचं, दहा दहा वर्ष देशाचे कृषीमंत्री म्हणून काम करायचं,” असं म्हणत पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा अजित पवारांनी घेतला.

कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या…
“बोलत असताना नेहमी तुम्ही पाहिलंय की कमरेखालचे वार शरद पवार कधीच करत नाहीत. त्यांच्या काळातही खूप आरोप प्रत्यारोप व्हायचे. तुम्हाला आठवत असेल तो मुंढे साहेबांचा काळ, गोरा खैरनारांचा काळ. मी सगळी नावं घेत बसत नाही. पण त्या काळातही यशवंतराव चव्हाणांच्या पठडीमध्ये तयार झालेले असल्याने पवारांनी कधीही स्वत:चा तोल जाऊ दिलेला नाही. अशा व्यक्तीबद्दल कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या पद्धतीचं वक्तव्य करते, हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं,” असं अजित पवार म्हणाले.

केतकीला अटक
केतकीने शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुराखाली वकील नितीन भावे असा उल्लेख आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केतकीवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते करीत होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एककडून सुरू होता. पोलीस केतकीचा सर्वत्र शोध घेत होते. ती नवी मुंबईच्या कळंबोली भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. नंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला. तिला अटक केल्याची माहिती युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

केतकी कायम वादात
केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हाही दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून तिने वाद ओढवून घेतला होता.