एकनाथ शिंदे फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात या दोघांनी एकत्र व्यासपीठावर हजेरी लावली, तसेच एकमेकांशी हास्यविनोदही केले. भाषणात आपल्या काहीही बिनसलं नसल्याचाच दावा दोघांनी केला. यावरून नव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अमेय खोपकरांनी केलेल्या खोचक टीकेलाही अजित पवारांनी महत्त्व देत नसल्याचं सांगितलं.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात दोघांना मिळून महाराष्ट्राच्या जनतेचा एकत्रित कौल असल्याचा दावा करण्यात आला. यावरून नव्याने चर्चा सुरू झाली. त्यामुळेच आज पालघरमधल्या कार्यक्रमात हे दोघे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
शिंदे-फडणवीसांची दिलजमाई?
कार्यक्रमात केलेल्या भाषणात दोघांनीही नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. “एखाद्या जाहिरातीमुळे कमकुवत होणारी ही मैत्री नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी या मैत्रीला जय-वीरू, धरम-वीरची जोडी सांगत “ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नहीं” असा ठाम विश्वासही भाषणात व्यक्त केला.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमवीर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आधी नाराजी आणि नंतर दिलजमाई झाल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत अजित पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी यावर सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांची सूचक प्रतिक्रिया
“मला काहीही वाटत नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही माहितीये की एकमेकांसोबत राहिल्याशिवाय दोघांची पदं राहणार नाहीत. १५५ आमदार जोपर्यंत त्यांच्याबरोबर आहेत, तोपर्यंत त्यांचं सरकार चालणार आहे. त्यामुळे ते कशाला एकमेकांमध्ये अंतर पाडून कशाला घालवतील? या सगळ्या चर्चा मीडियामध्येच आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
अमेय खोपकरांच्या टीकेला प्रत्युत्तर
दरम्यान, “चार खासदार असणारे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहातात आणि आमच्यावर टीका करतात”, असं म्हणत अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला होता. त्यावरही अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
“ज्यांना थोडंही डोकं चालवायचं नाही, असे लोक काहीही बोलतात. शरद पवारांनी आधीच सांगितलंय की मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. इतके कमी खासदार घेऊन कुणीही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आहे. पण कुणीही काहीही बोलायला लागलं तर त्यांच्या बोलण्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. कोण मुद्दा उपस्थित करतंय, त्यालाही महत्त्व आहे. त्यांना स्वत:ला पुरंदर मतदारसंघात नाकारलंय. ते नेहमीच असं काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्राची परंपरा आहे की वडिलधाऱ्या व्यक्तीचा आदर करणं. पण या लोकांवर संस्कारच असे झाले असतील, तर काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार?” असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.