बीड : बीडसह मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च झाले तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीत सामील झालो असल्याचे स्पष्टीकरण येथे दिले. टीकाकारांना विकासकामातूनच उत्तर देवू. आगामी लोकसभा आणि विधानसभा महायुतीबरोबर लढवू. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत काय वेगळा निर्णय घ्यायचा ते ठरवू. बीडचे पालकमंत्रिपदही राष्ट्रवादीकडे घेवू, असेही ते म्हणाले.

बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका स्पष्ट करताना मराठवाड्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. वेगळा निर्णय घेतल्यानंतर काहींनी धनंजय मुंडेंच्या बाबत चर्चा केली. धनंजय मुंडे यांचा संघर्ष, त्यांनी सामाजिक विभागाचा मंत्री म्हणून केलेले काम, घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळाची निर्मिती, मागासवर्गीय वस्त्यांची नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, आदींचा उल्लेख करून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

हेही वाचा >>>अंबानी यांनी भाडेतत्त्वावरील विमानतळांची वाट लावली! अजित पवारांची टीका

आम्ही टीकाकारांना कामातून उत्तर देवू, असे सांगत अजित पवार यांनी आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा महायुतीकडून लढवू, असे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा, ते ठरवले जाईल. दुष्काळ मुक्तीसाठी आठ जिल्ह्यांत काय करता येईल, यासाठी एक सविस्तर बैठक घेतली जाईल. त्यातून निर्णय घेवू. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च आला तरी सरकार निर्णय घेईल.

मार्चमध्ये सहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मी मांडणार आहे. त्यावेळी बीडसह मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या आता चांगल्या ओळखी झाल्या आहेत. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणात काही वेगळा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला लोक टीका करतात पण त्यांना विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्याची आपली पद्धत आहे, असे सांगत त्यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता मराठवाडा आणि महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न आणि शासनाच्या योजनांचा उल्लेख केला.

हेही वाचा >>>लवकरच चंद्रावर घरे देण्याचे आश्वासनही देतील; उद्धव ठाकरे यांची भाजप सरकारवर टीका

शरद पवारांच्या व्यासपीठावरून बोलतांना काही लोकांनी भान सोडले. जातीचा उल्लेख केला आणि माझा इतिहास काढला. माझा इतिहास लोक माझे सांगाती पुस्तकात लिहिला आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी उत्तर देत शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावरून जे बोलले तसे आमचे संस्कार नाहीत, असा निशाणा साधला. राजकारणात पहिल्यांदा भाजपकडून विधान परिषदेची निवडणूक लढवताना दोन मते देऊन अजित दादांनी मदत केली होती. जिल्ह्याने राष्ट्रवादीवर प्रेम केलं. त्याचं उत्तरदायित्व म्हणून अजित दादांनी विकासाच्या माध्यमातून कामे केली. त्यामुळे ही सभा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर विकासाची, सन्मानाची आणि दुष्काळ निवारणाची असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.