मोहन अटाळकर
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९६.३४ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी आहे.
मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ५१ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण १ लाख ४४ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.३४ इतकी आहे. गेल्या वर्षी बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९९.३७ टक्के लागला होता, पण निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभागाची घसरण आठव्या स्थानी झाली होती.