रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता मच्छीमारांनी सुरक्षिततेसाठी जवळच्या बंदरांचा आसरा घ्यावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे शनिवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यत ढगाळ वातावरण आणि हलका वारा होता. त्याचा परिणाम हापूसवर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या वादळाचा कोकण किनारपट्टीवर काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. पण त्या भागातील नौकांना गरज पडल्यास आश्रय देण्याची, तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्यांनी जवळच्या बंदरांचा आधार घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. इतर भागातून राज्यातील बंदरांवर सुरक्षिततेसाठी येणाऱ्या मच्छिमारांनाही निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना करण्यात आल्या असल्याचे सहाय्यक मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यत मागील आठवडाभर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमानातील अंतर १५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. कमाल तापमान ४० अंशांपर्यंत नोंदले गेले . त्यामुळे उष्मा वाढला आहे. शिमगोत्सव सुरु असून गावागावामध्ये होळ्या उभ्या राहिल्या आहेत. परंपरेप्रमाणे होळी उभी राहिली की त्यावर पाऊस पडतो, असे जुने—जाणते लोक म्हणतात. तशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही कालावधीपुरते कडकडीत उन पडले; मात्र दुपारनंतर पुन्हा हलका वारा आणि ढगाळ वातावरण होते.