आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जागावाटप चालू आहे. अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातल्या सर्व पक्षांनी काही मतदारसंघांमधील त्यांचे उमेदवार जाहीर केले असले तरी काही जागांवर युतीतल्या पक्षांमध्ये आणि आघाडीतल्या पक्षांमध्ये एकमत झालेलं दिसत नाही. महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी, परभणीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे वंचितने मविआतून काढता पाय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतल्या पक्षांमध्ये नाशिक, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जागांवर संघर्ष होत आहे. महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक होती. परंतु, मविआ त्याबाबत निर्णय घेऊ शकली नाही. यावरून भारतीय जनता पार्टी मविआवर टीका करत आहे. भाजपा नेते आणि माजी आमदार आशिष शेलार यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून मविआला कवितेतून टोला लगावला आहे. शेलार यांनी प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्या 'तुझ्या गळा, माझ्या गळा…' या कवितेचं विडंबन करत मविआवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी ही कविता एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरदेखील शेअर केली आहे. हे ही वाचा >> भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू झालेले २५ नेते भाजपात, २३ जणांना थेट दिलासा! शेलार यांनी शेअर केलेली कविता तुझ्या गळा, माझ्या गळागुंफू आघाडीच्या माळासांगलीची जागा कोणाला?चल निघ काँग्रेस चहाटळा ! तुज भिवंडी, मज साताराउत्तर मुंबई कोणाला ?वेड लागले नानालाकाय द्यावे? वंचितला! तुज मशाल, मज तुतारीआणखी हात कोणाला?कोण सांगेल मीडियाला?पोपटलाल एक नेमलेला! खुसू खुसू, गाली हसूवरवर अपुले रुसू रुसूताईंसाठी एक दिसूबाकी जागांवर भांडत बसू!! कशी कशी, आज अशीगंमत घमंडीयाची पाहशीआता कट्टी फू काँग्रेसशी?तर मग गट्टी कोणाशी? (श्रेष्ठ कवी भा.रा. तांबे यांची क्षमा मागून…)