कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसनं बहुमत मिळवल्याचं चित्र आता दिसू लागलं आहे. भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातल्या नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. या निकालावर आता देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय करतो, काय बोलतो ते मतदारांना महत्त्वाचं वाटतं. यात त्यांना स्वारस्य असतं. स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या किंमतींमुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आपण पाहिल्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना आकर्षक वाटला. यात महिलांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून विनामुल्य प्रवास करता येईल. महिलांना दर महिन्याला काही पैसे दिले जातील (त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार). बेरोजगार युवकांना भत्ता दिला जाईल. या अशा घोषणांमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे असं चित्र दिसतंय. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी अशोक चव्हाण यांना विचारलं की, काँग्रेसचे आमदार बँगलोरमध्ये स्थलातंरित केले जात आहेत. काँग्रेसला आमदार फुटतील अशी भीती आहे असं वाटतंय का? यावर अशोक चव्हाण म्हणाले, भीती नाही दक्षता म्हणून हे सगळं केलं जात असावं. सध्या देशात काहिही घडू शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये वाईट अनुभव आलाय. मध्य प्रदेशात आणि गोव्यात तेच घडलं आणि मग सरकारं पाडली. कर्नाटकात तर आलेलं सरकार पाडलं. हे ही वाचा >> Jalandhar Bypoll : केजरीवालांच्या पठ्ठ्यानं भाजपा-काँग्रेसला चारली धूळ, काय आहे आपच्या विजयाचं गमक? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, मागचे अनुभव लक्षात घेता त्याची पुन्हा पुनरावृती होऊ नये म्हणून दक्षता घेणं आवश्यक आहे. लोकांचं बहुमत आपल्या बाजूने असतानाही अशा भानगडी होऊ नयेत म्हणून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दक्षता घेतली आहे.