शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापा टाकला असून साधारण सात तासांपासून राऊतांची चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कर नाही तर डर कशाला, राऊतांनी काहीही केले नसेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जावे, असे शिंदे गट आणि भाजपाकडून म्हटले जात आहे. तर ही कारवाई सूडबुद्धीने केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जातोय. दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यांनीदेखील राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली असून राज्यपालांच्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> Sanjay Raut ED Raid : “राज ठाकरेंनी ३ महिन्यांपूर्वीच…” संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर संदीप देशपांडेंचे विधान

“आपल्याला जी सत्ता मिळालेली आहे तीचा केला जाणारा उपयोग तसेच तपास यंत्रणांचा स्वत:च्या हितासाठी केला जाणारा उपयोग हे लपून राहत नाही. हट्टाला पेटण्यासारखे झाले आहे. हाच हट्ट पूर्ण करण्यासाठी हे केले जात आहे. राज्यपालांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यामुळे भाजपा आणि राज्यपालांवर जी टीका केली जात आहे, त्यातून निसटण्यासाठी हा प्रयत्न केला जातो,” असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “यापूर्वीच त्यांना अटक व्हायला हवी होती”; ईडी कारवाईनंतर नवनीत राणांची राऊतांवर टीका

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील राऊतावरील कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलंय. “न्यायिक बाजूने किंवा यंत्रणा म्हणून जे काम करत आहेत त्यांना काम करु दिले पाहिजे. महाराष्ट्रात शासकीय यंत्रणांचा सुळसुळाट झाला आहे. या लोकांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवरच ही कारवाई केली जात आहे. अनेकांच्या मागे ईडी लागली आहे. अनेकांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. जे घडत आहे ते आपण सर्वजण पाहत आहोत. एकतर ईडीला सामोरे जा किंवा नसेल तर भाजपात या, असे सुरु आहे. राज्यपालांनी केलेल्या विधानानंतरचा प्रक्षोभ राऊतांवरील कारवाईमुळे दाबला जाणार नाही. ठिकठिकाणी सह्यांच्या मोहिमा सुरु केल्या आहेत. सर्व सामाजिक संस्थांनी कोश्यारी यांच्या विधानाची दखल घेतली आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.