प्रबोध देशपांडे अकोला : सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबून दडपशाही करीत असल्याने जनसंवादासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढावी लागली, असा आरोप काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. भीतीपोटी सावरकर इंग्रजांना शरण गेल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. या वेळी त्यांनी सावरकरांनी लिहिलेले एक पत्रदेखील सादर केले. ‘भारत जोडो’ यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर राहुल यांनी दुपारी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. देशातील लढाई फक्त दोन पक्षांत नाही. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र, भाजपचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळय़ा संस्थांवरही भाजपचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र, आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे भारत जोडो यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे राहुल गांधी म्हणाले. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे आव्हान राहुल गांधींनी दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. उलट महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण त्यांनी कोणताही माफीनामा चिठ्ठी लिहिली नाही. सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्या वेळी एक प्रकारे स्वातंत्र्यलढय़ातील इतर नेत्यांना दगा दिला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या वेळी त्यांनी सावरकर यांचे एक पत्रदेखील सादर केले. त्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी पत्रात म्हटल्याचे राहुल गांधी यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कुठेही शिक्षण घेतलेले असले, तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरुण मला भेटलेला नाही, असेही राहुल गांधी म्हणाले. मेडशीच्या सभेत नेपाळचे राष्ट्रगीत वाजल्याने गोंधळ ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान बुधवारी रात्री मेडशी येथील जाहीर सभेनंतर भारताच्या राष्ट्रगीताऐवजी काही सेकंद नेपाळचे राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याने गोंधळ उडाला. सभा आटोपल्यानंतर व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी राहुलसह सर्व उभे राहिले होते. पण, त्याच वेळी अचानक नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले. जेव्हा गाण्याचे बोल सुरू झाले. तेव्हा राहुल व व्यासपीठावरील इतर नेत्यांच्या ते लक्षात आले. त्यानंतर तातडीने राहुल गांधींनी हे गीत थांबवण्यास सांगितले. नंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. पण, या घटनेने विरोधकांना राहुल गांधी यांच्यावर टीकेची संधी मिळाली आहे. महात्मा गांधींशी तुलना अयोग्य अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे १७ नोव्हेंबर १९३३ रोजी महात्मा गांधी यांनी सभा घेतली होती. आज त्याच दिवशी राहुल गांधी येथे आल्याने हा योगायोग की तसे सुनियोजित आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता, महात्मा गांधींशी तुलना करणे संपूर्णत: अयोग्य असल्याचे राहुल म्हणाले.