सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर त्यावर आपली स्वामीनिष्ठा, परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे. पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे अशी टीका भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

“पूजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देत आहे आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला,” असं त्या म्हणाल्या आहेत.

“महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. आपल्या अत्याचाराविरूद्धसुद्धा माझ्या एका भगिनीने न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही आता या अत्याचारी प्रवत्तीविरूद्ध लढायचं ठरवलं त्यामुळेच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात,” असेही वाघ महणाल्या.