काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावर एकीकडे भाजपाकडून हल्लाबोल केला जात असताना महाविकास आघाडीतील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाकडूनही या विधानाशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे या विधानावरून वाद सुरू झालेला असताना भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला आहे. काय म्हणाले होते राहुल गांधी? भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी एका जाहीर सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी हा दावा केला होता. 'सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. त्यांनी काँग्रेसविरोधात ब्रिटिशांसोबत काम करण्याचं मान्य केलं होतं. तसेच, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते', अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केल्यानंतर त्यावरून भाजपानं हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. “मी सांगून ठेवतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआमध्ये फूट…”, संजय राऊतांचं मोठं विधान! "किती हा विरोधाभास?" दरम्यान, या मुद्द्यावरून राहुल गांधींवर टीका करताना चित्रा वाघ यांनी इंदिरा गांधींचा संदर्भ दिला आहे. "रागां म्हणतात की ही त्यांची भारत जोडो यात्रा.. नफरत से नहीं तो प्यार से जोडो. ते स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी भूमी महाराष्ट्रात येतात आणि देशाला अभिमान वाटावा अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावानं विखारी टीका करतात. वाद उत्पन्न करतात. किती हा विरोधाभास?" असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. "प्यार से जोडने आए हो या नफरत फैलाने? अर्थात रागांकडून कोणती अपेक्षा करणार? त्याला वैचारिक अधिष्ठान असावं लागतं. त्यांच्या आजी इंदिराजी यांनी सावरकरांद्दल आदर व्यक्त करून गौरवोद्गार काढले होते", असंही चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "गांधी कुटुंबातलं नेमकं कोण खरं बोलतंय?" दरम्यान, गांधी कुटुंबातलं कोण नेमकं खरं बोलतंय? असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे. "इंदिरा गांधींनी काढलेले गौरवोद्गार खोटे होते का? मग नक्की गांधी परिवारातलं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय, हे जनतेसमोर येणं आवश्यक आहे.या अपमानाबद्दल राहुल गांधींनी माफी मागणं गरजेचं आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही", असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.