करोना चाचण्या सातत्याने नियंत्रित केल्या जात असल्याने दिवसेंदिवस स्थिती आणखी विदारक होत चालली आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत चाचण्या वाढवण्याची मागणी करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. देशातील सात राज्यं ७० टक्के रुग्णांची भर घालत असून यातील केवळ तीन राज्यं ४३ टक्के भर घालत आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा २१ टक्के आहे असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

“करोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

आणखी वाचा- देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील; २५ हजार जणांचा मृत्यू

“मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६५७४ होती, ती ७७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४ टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७ हजार ५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४ हजार ८०१ इतकी झाली. ही वाढ ४२ टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४ टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्यात नव्या १५,७६५ करोनाबाधितांची नोंद; एकूण संख्या ८ लाखांवर

देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (८४७), आसाम (७४८), कर्नाटक (७४०), बिहार (६५०), तेलंगाणा (६३७), उत्तराखंड (५९०), हरयाणा (५६३) इतकी आहे. भारताची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (४.१८ टक्के), उत्तरप्रदेश (४.५६ टक्के), पंजाब (४.६९ टक्के), मध्यप्रदेश (४.७४ टक्के), गुजरात (५.०१ टक्के), बिहार (५.४४ टक्के), हरयाणा (५.५१ टक्के), ओरिसा (५.७१ टक्के), झारखंड (६.१९ टक्के), गोवा (८.०५ टक्के), तामिळनाडू (८.१० टक्के), भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे.

आणखी वाचा- दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं करोनाबाधितांची राजधानी; देशातील रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार

अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्‍यात खाटांची क्षमता अधिक वाढविणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा सूचनांचाही फडणवीस यांच्या यात समावेश आहे.