मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीनिमित्त स्वत: कार चालवत पंढरपूरला गेल्यानंतर एकीकडे कौतुक होत असताना विरोधक मात्र यावरुन निशाणा साधताना दिसत आहेत. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही अशा शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही असंही ते म्हणाले आहेत. "ठाकरे सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केल्याने या आरक्षणाचं वाटोळं झालं आहे. असाच प्रकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांना लागू करण्याससंदर्भात सरकार करत आहे," असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आषाढी एकादशी : भर पावसात मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना "ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत ठाकरे सरकाने ज्या पद्धतीनं फक्त तारखावर तारखा मागितल्या आणि नाईलाजास्तव यांच्या नाकर्तेपणामुळे न्यायालयाला ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करावं लागलं. आज तोच नाकर्तेपणा करत जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॉरीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालेलं आहे," असं ते म्हणाले आहेत. “स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं” "केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. पण पाच वेळा उच्च न्यायालयाने तंबी देऊन सुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे.. शेवटी उच्च न्यायालयाने कडक आदेशाची भूमिका घेत राज्याचे मुख्य सचिव यांना या योजनेवर निर्णय घेत कोर्टात हजर राहायला सांगितले आहे," असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. "सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही," अशी टीका यावेळी त्यांनी केली.