राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(ठाकरे गट) नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, “अशा पद्धतीने महाराष्ट्र तोडण्याचं काम ज्या भाजपाचं कर्नाटकमध्ये सरकार आहे, त्या सरकारकडून होतंय, त्याला प्रतिबंध करणे विद्यमान महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने सत्तेसाठी लाचार झालेलं शिंदे सरकार या भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहे आणि महाराष्ट्राचे तुकडे पाडायला हे सरकार निघालेलं आहे. मात्र आजही शिवसेना पूर्वीप्रमाणेच या मुद्य्यावर फ्रंटफूटवरच लढणार आहे.”

हेही वाचा – “कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे, वेळ पडली तर…”; विनायक राऊतांचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “दुर्दैवं असं आहे की महाराष्ट्रातील शिंदे सरकार केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी वेगवेगळ्या ज्योतिष्यांकडे जाऊन हात दाखवण्याचे उपद्वव्याप करत आहे. इकडे उद्योगमंत्री कामाख्या देवीला जातात आणि मोठी डरकाळी फोडतात की आमच्याकडे आणखी उद्योग येणार आहेत. नसते उद्योग करत फिरण्यापेक्षा चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यामातून भाजपा करत आहे, हा आमचा आरोप आहे.” असंही खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.