पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. या अगोदरही राऊतांना याच घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला मारला आहे. “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना त्यांनी दिली.

ईडीची चौकशी काय असते हे राऊतांना आता कळेल

“पत्राचाळमधील गरीब रहिवाश्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. राऊत स्वत:ला फार मोठे समजायचे. झुकेगा नही म्हणणाऱ्या राऊतांची आता काय अवस्था आहे हे एकदा विचारा. भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार केल्यानंतर संजय राऊतांना वाटायचं त्यांना कधीच काहीही होणार नाही. ईडीची चौकशी आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय आहे हे आता त्यांना कळाले असेल,” असे म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

पाहा व्हिडीओ –

भ्रष्टाचार केला तर शिक्षा भोगावी लागणार

पत्राचाळ रहिवाश्यांची संजय राऊत आणि त्या बिल्डरांनी मिळून फसवणूक केली आहे. या फसवणूकीची शिक्षा त्यांना मिळायला हवी. भ्रष्टाचाराची किंमत राऊतांना चूकवावी लागणार. तुम्ही भ्रष्टाचार केला असेल, पैशांची हेराफेरी, गरीब लोकांना फसवलं असेल तर त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारचं. सकाळी सकाळी येऊन राऊत इतरांची सकाळ खराब करायचे तो आव आता आणून दाखवा, अशी टीकाही नितेश राणेंनी राऊतांवर केली आहे.