विश्वासघाताने युतीधर्म तोडून, हिंदुत्वाशी तडजोड करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पितृकृपने पर्यावरण खात्याचे मंत्रीपद तुमच्या पदरात पडले होते. पर्यावरण खात्याचं मंत्रीपद मिळवण्यासाठी आपलं कर्तृत्व काय होतं? अशी विचारणा भाजपा आमदार अमित साटम यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना केली आहे. आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

“तुम्ही मंत्रीपदावर असताना केलेल्या ‘कर्तृत्वामुळे’ आता न्यायालयानेच राज्य सरकारला तब्बल १२ हजार कोटी दंड ठोठावला आहे. त्यासाठी तुमचे अभिनंदन,” अशी उपरोधिक टीका अमित साटम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

“मुंबईकरांच्या जीवाला हानिकारक असलेला घनकचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने हरित लवादने महाराष्ट्र सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावला आहे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या पीठाने मागील आठवड्यात हे आदेश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“एकप्रकारे तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईसाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैश्यावर परदेश दौरा करण्याशिवाय आपण काहीही साध्य केले नाही. मलमिश्रीत काळेपाणी समुद्रात सोडून मुंबईच्या समुद्राला मात्र तुम्ही काळासमुद्र करून दाखवले. आपले कर्तृत्व एवढेच की ‘बॅल्क सी’ पाहण्यासाठी मु्बईकरांना युरोपात जाण्याची गरज नाही कारण तो आपण मुंबईकरांना इथेच दाखवला आहे,” असा टोला अमित साटम यांनी लगावला आहे.