शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी  केलेल्या आरोपानुसार ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या चौकशीची केलेली घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यावरच गुरुवारी उलटली. चौकशीच्या घोषणेचे इतिवृत्त बदलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीवरून गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. राज्यमंत्री जाधव यांनीही या आरोपांना पुष्टी दिल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी दिले.
सरनाईक आणि राजीव यांच्यात गेल्या काही माहिन्यांपासून वाद सुरू आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान सरनाईक यांनी हल्लाबोल करताना राजीव यांनी पालिकेच्या आयुक्त निवासस्थानी नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप केला होता. तसेच परदेशात जाणे, १२एकर जागेत फार्म हाऊस उभारले आदी आरोपही केले होते. त्यावर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव(दोन) यांच्या मार्फत या आरोपांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली होती.