ग्रामीण कृषी पर्यटनात चौकुळ गावाचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मतदार संघातील संसद गावाप्रमाणे विकसित करण्यासाठी चौकुळची निवड केली आहे. या चौकुळ, कुंभवडे गावात पर्यटक मोठय़ा प्रमाणात येऊ शकतात, पण रस्त्यांची झालेली चाळण हाच मोठा आर्थिक तोटा निर्माण करणारा प्रश्न बनला आहे. चौकुळ गाव ग्रुप ग्रामपंचायतीत कुंभवडे हा कुंभासारखा गावही आहे. चौकुळ गावाचा विकास ग्रामीण कृषी पर्यटनातून सुरू आहे. चौकुळ, कुंभवडे गावात पर्यटक येतात पण या गावातील रस्त्यावर पडलेले खड्डे हा मात्र पर्यटनाला तोटय़ाचा विषय बनला आहे. चौकुळ गावाची ग्रामीण पर्यटन अंतर्गत खासगी चळवळीतून विकास साधणाऱ्या प्रक्रियेतील एक बाळासाहेब परुळेकर यांनी चौकुळनंतर कुंभवडे गावाचा पर्यटनदृष्टय़ा विकास करताना सेंद्रीय शेतीच्या दृष्टीनेही विकास व्हावा म्हणून नुकतीच भेट दिली. कुंभवडे गावचे सुपुत्र चौकुळ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय गावडे यांनी त्यांचे स्वागत केले. चौकुळ, कुंभवडे गावातील डांबरी रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण कृषी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांत नाराजी आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ गावाचा विकास संसद गावाप्रमाणे करण्यासाठी या गावाची निवड केली आहे. त्यांनी प्रथम रस्ते पक्के करावेत. तळकट-कुंभवडे-चौकुळ हा रस्ता तसेच सावंतवाडी-ओटवणे आणि आंबोली-चौकुळ हा रस्ता सुधारणा केल्यास पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. ग्रामीण कृषी पर्यटन व सेंद्रीय शेतीसाठी सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फॉम्र्स फेडरेशनचे बाळासाहेब परुळेकर यांनी चळवळ उभारली आहे. त्यांच्यासह रणजित सावंत, अभिमन्यू लोंढे यांनी नुकतीच माजी सरपंच विजय गावडे यांच्या कुंभवडे गावाला भेट दिली. त्यावेळी या रस्त्याची दुर्दशा डोळ्यासमोर आली. कुंभवडे गावात सुमारे पाचशेच्या जवळपास लोकवस्ती आहे, पण बहुतेक नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने गावात राहत नाहीत. पण माजी सरपंच विजय गावडे यांनी शहराची वाट धरलेली नाही. त्यांचा भाऊ मुंबईत आहे पण विजय गावडे आई-वडिलांच्या सेवेसाठी कुंभवडेत राहिले असल्याचे म्हटले. कुंभासारखा आकार असणाऱ्या या गावात विलोभनीय निसर्ग, अचंबित करून टाकणारे धबधबे व दोन नद्यांच्या संगमावर वाहणारे बारमाही धबधबे विकसित करण्याचा मानस विजय गावडे यांनी केला. कृषी पर्यटन अंतर्गत विकास करताना शासनावर अवलंबून राहण्याचे टाळत त्यांनी स्वत:च्या मेहनत व कल्पनेतून पर्यटकांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.