​सावंतवाडी: शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली आहे. शहराचा ‘तिसरा डोळा’ बंद पडल्याने चोरी आणि घरफोडीच्या घटनांचा तपास करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. परिणामी, पोलिसांना खासगी सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे शहरातील नागरिक असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे.

​गेल्या चार दिवसांत शहरात पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. सर्वोदय नगरमध्ये एका अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम लंपास केली, तर याआधी लक्ष्मी नगर परिसरात एका वृद्ध महिलेला अडवून तिचे दागिने चोरण्यात आले होते. या दोन्ही घटनांचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कमतरतेमुळे मोठी अडचण येत आहे. लक्ष्मी नगरमधील घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे अद्यापही पूर्ण झालेला नाही. सर्वोदय नगरमधील चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी त्यांचे चेहरे झाकलेले असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले आहे.

​माजी गृहराज्यमंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी शहरातील मुख्य ठिकाणी हे कॅमेरे बसवले. हे कॅमेरे थेट सावंतवाडी पोलिस ठाण्याला आणि सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाला जोडलेले आहेत. पण त्यांची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत. अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाकडून यावर कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. संबंधित कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कॅमेरे बंद असल्याचे कारण पुढे आले आहे, असे पोलीस सांगतात. मात्र, स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या या उदासिनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या तपासावर परिणाम

​सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या तपासावरही नकारात्मक परिणाम होत आहे. पोलीस प्रशासनाने शहरावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले असले तरी, ऐनवेळी ते बंद असल्याने त्यांचा काहीही उपयोग होत नाही. यामुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले आहे. स्थानिक नागरिक प्रशासनाकडे हे बंद पडलेले कॅमेरे तातडीने सुरू करण्याची वारंवार मागणी करत आहेत, जेणेकरून शहरात शांतता आणि सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित होईल.