शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे. आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील हजारो शिवसैनिक दरवर्षी त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यानंतर आता ते आनंद दीघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन वंदन करणार आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “दरवर्षी गुरूपोर्णिमेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आम्ही सगळेजण नतमस्तक होत असतो. गुरूपोर्णिमेला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात वेगळी भावना असते. आज स्मृतीस्थळावर वंदन करताना आमच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा, भावना आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झालं. त्यांनी दिलेला विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे ५० आमदार करत आहेत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय.”

पुढे त्यांनी सांगितलं “बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार आम्ही महाराष्ट्रात पुढे नेतोय. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आमचं युती सरकार करेल. राज्याचा सर्वांगीण विकास आमचं सरकार करेल. त्यामुळे शेतकरी, कामकरी, वारकरी, कष्ठकरी आणि सर्व समाज घटकांचा उत्कर्ष आणि राज्याचा विकास हेच आमचं ध्येय आहे. म्हणूनच आम्ही सर्वांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना वंदन केलं आहे. त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.”

हेही वाचा- “…म्हणून गद्दारी झाली”; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले…

“यानंतर आता मी धर्मवीर आनंद दीघे यांच्या शक्तीस्थळाला विनम्र आभिवादन करायला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिवसैनिक न चुकता ठेंभी नाक्यावर आनंद दीघे साहेबांना वंदन करण्यासाठी येत आहेत. मी देखील जात आहे,” असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.