‘‘महाळाज, घली जौनाला चला ना’’ उजाड माळरानातून जाणाऱ्या रस्त्यावर चिमुकले बहीण-भाऊ येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला घरी जेवणाचे निमंत्रण देत होते. मुख्य रस्त्यापासून जाणाऱ्या एका पायवाटेच्या टोकाला दूरवर एक झोपडी होती. या झोपडीला वारकऱ्याचे पाय लागावेत, या अपेक्षेने आईने भाजी-भाकरी केली होती. दोन तरी वारकऱ्यांना झोपडीपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी आईने या चिमुरडय़ांवर दिली होती. सूर्य माथ्यावरून बराचसा ढळला होता. पालखीच्या दुपारच्या विसाव्यात बहुतेक वारकरी जेवण करूनच वाटेवर निघाले होते. त्यामुळे अनेकांचे या मुलांकडे लक्षही जात नव्हते. येईल त्या वारकऱ्याच्या पायावर माथा टेकवून ही मुले आमंत्रण देत होती. ‘‘पोटभर जेवलोय पोरांनो’’ असेच उत्तर त्यांना मिळत होते. एखादा वारकरी मुलांसोबत जाण्यास तयार होई, पण झोपडीची दूरवरची वाट पाहून तो पुन्हा माघारी फिरत होता. जेवायला कुणीच येत नसल्याने दोघांचे चेहरे अगदी रडवेले झाले होते. त्याही अवस्थेत त्यांची विनवणी सुरूच होती. अखेर एक वारकरी त्यांच्यासोबत येण्यास तयार झाला. त्या वेळी या मुलांच्या चेहऱ्यावर जगातले सर्वोच्च सुख मिळाल्याच्या आनंदाची लकेर उमटली..
वारीच्या वाटेवरील ही घटना वारकऱ्यांबद्दल असलेल्या सेवाभावाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. सावळ्या परब्रम्हाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये असलेल्या भक्तिभावाच्या तुलनेत मार्गावरील भाविकांचा सेवाभावही कमी नाही. पालखी मार्गावर येणारी शहरे व मोठय़ा गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची व्यवस्था केली जात असते. मात्र, मार्गापासून दूरवर असलेली खेडी, वस्त्यांवरील भाविकही ऐपतीप्रमाणे हा सेवाभाव जोपासतात. वारकऱ्यांची सेवा म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानोबा- तुकोबांची सेवा, ही भावना पिढय़ान्पिढय़ा कायम राहिली आहे. त्यामुळेच पालखी मार्गावर वारकऱ्यांची व्यवस्था करण्याची परंपरा टिकून आहे व त्यात दिवसेंदिवस वाढच होते आहे.
मोठय़ा प्रमाणावर भोजनाची व्यवस्था करण्याची ऐपत नाही, पण वारकऱ्यांना काहीतरी द्यायचे या भावनेतून आजही मार्गावर वारकऱ्यांना छोटीशी शिदोरी दिली जाते. माठात मुरत घातलेल्या कैरीच्या लोणच्याच्या फोडी किंवा पिठलं अन् त्यासोबत ज्वारी-बाजरीच्या दोन भाकरी एका कापडामध्ये बांधून आणायच्या व ही शिदोरी रस्त्याने चाललेल्या वारकऱ्याच्या हाती द्यायची. वाडय़ा-वस्त्यावरील अनेक कुटुंबे कित्येक वर्षांपासूनच हे करीत आहेत. भोजनाची व्यवस्था करायला पैसे नाहीत, पण मीही काहीतरी करणार, या इच्छेने वारकऱ्यांचे पाय चेपून देणारी मंडळीही वारीच्या वाटेवर आहेत. चालून-चालून थकलेल्या, पायाला गोळे आलेल्या वृद्ध वारकऱ्याचे कष्ट थोडे हलके केल्याचे समाधान त्यातून ही मंडळी मिळवितात. याच प्रकारातून आता शहरात किंवा मोठय़ा गावांमध्ये संस्था, मंडळे वारकऱ्यांचे पाय चेपून देण्याचा उपक्रम मोठय़ा प्रमाणावर राबवितात.
छोटय़ा-छोटय़ा पद्धतीने होणाऱ्या या सेवाभावातूनच वारकऱ्यांच्या सेवेच्या विविध कल्पना गरजेनुसार निर्माण झाल्या. त्यातून या सेवाभावाला आता व्यापक रूप मिळाले. भोजनाच्या व आरोग्याच्या सेवेपासून आता चपला दुरुस्त करणे, दाढी करणे, छत्र्या दुरुस्त करून देणे, कपडय़ांना इस्त्री करून देणे आदी अनेक सेवांपासून नव्या जमान्यात आता वारकऱ्यांचा मोबाईल चार्ज करून देण्याचीही सुविधा करण्यात येते. भक्तिभावाचे स्वरूप व्यापक होत असताना सेवाभावही मागे राहिलेला नाही, याचीच साक्ष यातून मिळते.