अलिबाग– आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पनवेल महानगर पालिका आणि सर्व नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. या शहरांमध्ये प्राथमिक पहाणीत ४९९ इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. यात पनवेल येथे सर्वाधिक २१५ ,कर्जत येथे १५४, उरण ६४, महाड ११, श्रीवर्धन ११, अलिबाग ९, रोहा ८, पेण ८, मुरुड ४, माथेरान ६, खालापूर ३, म्हसळा ९ धोकादायक इमारतींचा समावेश आहे.

हेही वाचा >>> अलिबाग : विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने महिलेकडून ४० लाख लुटले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतींमधील रहिवाश्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर खालापूर, तळा, म्हसळा, माणगाव, सुधागड आणि पोलादपूर येथील नगरपंचायतीना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून, तेथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या आधी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश स्थानिक नगरपालिकांना दिले होते. याचा अहवाल प्राप्त झाला असून धोकादायक इमारतीं मधील नागरिकांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड</p>