मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये ‘नागरिक-सैन्य समन्वय’ बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नागरी सुरक्षेच्या संदर्भात एक बैठक आपण घेतली होती. कारण या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक आपण घेतली होती. तसंच आपलं जे सेनादल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी थेट बैठक घेतली नव्हती. आज जी बैठक घेतली ती या दिवसांमध्ये जो अनुभव आला त्यातून अधिक काय करायचं? आपली दिशा कशी असली पाहिजे आणि कशी सावधगिरी बाळगली पाहिजे या दृष्टीने सैन्य दलाच्या अपेक्षा समजून घेतल्या. जी काळजी वाटते ती आम्ही सांगितली. आपल्या सैन्याने पाकिस्तानला त्याची जागा दाखवली. आपल्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आणि दशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पाकिस्तानला माहीत आहे की भारताविरोधात आपण लढू शकत नाही. असं झालं की पाकिस्तानकडून प्रॉक्सी वॉर सुरु करतात. मुंबईच्या दृष्टीने काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी आजची बैठक केली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान प्रॉक्सी वॉर करुन मुंबईला लक्ष्य करु नये म्हणून…
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्याला कुठे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली. त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानचा इतिहास सांगतो की ते प्रॉक्सी वॉर करतात. अशात मुंबईला लक्ष्य केलं जाऊ नये म्हणून आम्ही ही बैठक घेतली. या बैठकीत सेनेचे अधिकारी होते. त्यांच्यासह आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आता पुढे काय काय खबरदारी घेतली पाहिजे? तसंच गुप्तचर यंत्रणांशीही आमची चर्चा सुरु आहे. पुढे रणनीती कशी असेल यावर चर्चा केली.” असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अचूक आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक करताना त्याला ‘अभूतपूर्व’ असे संबोधून संरक्षण दलाला सॅल्युट करतो, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी येथे झालेले दहशतवादी हल्ले हे आर्थिक पायाभूत रचनेवरचा थेट आघात होते. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यातील समन्वय अधिक सशक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीचे आदानप्रदान व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीला कोण उपस्थित होतं?
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल आणि कर्नल, नौदलातर्फे रिअर अॅडमिरल आणि कमांडर, वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक आणि गृह व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस आणि होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.