लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे एकनिष्ठ नेते संदीपान भगवान थोरात यांच्या पार्थिवावर शनिवारी त्यांचे मूळ गाव असलेल्या निमगाव (माढा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र काही अपवाद वगळता काँग्रेसच्या नेते मंडळींनी थोरात यांच्या अंत्ययात्रेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. आयुष्यभर पक्षावर आढळ निष्ठा वाहिलेल्या दिवंगत नेत्याचा पक्षालाही विसर पडला की काय, अशी प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळाली.

काँग्रेसच्या पडत्या काळात, विशेषतः दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक दिग्गज नेते दूर झाले, तेव्हा काही मोजके नेतेच नेते त्यांच्याजवळ होते. १९७७ साली जनता पक्षाची लाट असतानाही पंढरपूर राखीव लोकसभा निवडणुकीत संदीपान थोरात यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील आदी नेत्यांनी ताकद उभी केल्याने थोरात खासदार झाले. त्यानंतरही पंढरपूर लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या ताकदीवर थोरात लोकसभेवर निवडून यायचे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि विजयसिंह मोहिते-पाटील काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले. तेव्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे थोरात यांचा प्रथमच पराभव पत्करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २०-२२ वर्षात राजकारणात सक्रिय नसलेले थोरात यांचे प्रदीर्घ आजाराने सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी रूग्णालयात मृत्युशय्येवर असलेल्या थोरात यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तेवढाच अपवाद वगळता थोरात यांच्या शेवटच्या काळात काँग्रेसचा एकही नेता त्यांना भेटायला आला नव्हता. शेवटी निधनानंतर मूळ गाव असलेल्या निमगाव (माढा) येथै त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे, थोरात यांच्या विरोधात १९८० आणि १९८४ सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन समाजवादी काँग्रेसकडून उभे राहिलेले भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे आदी मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता काँग्रेससह अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा थोरात यांच्या अंत्ययात्रेत सहभाग नव्हता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हेसुध्दा आले नव्हते. परंतु नेत्यांनी पाठ फिरविली तरीही माढा, पंढरपूर, सोलापूर भागातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय होता.