ठाकरे सरकारने लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. ठाकरे सरकारने यावेळी काही नवे निर्बंध जाहीर केले आहेत. यावेळी ठाकरे सरकारने परराज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकार केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट ४८ तास आधी काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

याशिवाय कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर परराज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा असंही आदेशात नमूद आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर

स्थानिक बाजारपेठा तसंच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून करोनाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणं शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

औषधं आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असं सागंण्यात आलं आहे. हे सर्व निर्बंध १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

राज्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी आजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.