बिबट जेरबंद अथवा ठार होत नाही तोपर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा दररोज घेण्यात यावा, तसेच चोवीस तास गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी येथे एका नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
वन्यप्राणी-मानव संघर्षांला कारणीभूत ठरणाऱ्या बिबटय़ास जेरबंद अथवा ठार मारण्याच्या वन विभागाच्या कारवाईचा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एस.मिश्रा यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीत बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी दिवस-रात्री प्रत्येकी तीन पथके कार्यरत असून चंद्रपूर येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. हे प्रत्येक पथक सहायक वनसंरक्षकांच्या अधिनस्त असून यात दोन शार्प शूटर्स, एक पशुवैद्यकीय अधिकारी, ट्रँक्युलाईजसाठी वन विभागाचे एक तज्ज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था, ग्रामसभांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त पदमापूर व मामला येथे रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली आहे. संबंधित टिमकडून दर तासात बिबटय़ाच्या हालचालींची कंट्रोल रूमला माहिती देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी दहा पिंजरे लावण्यात आले आहेत. प्रभावित क्षेत्रात गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांपासून सतर्कतेबाबत अशासकीय संस्था व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे.