सांगली : गेल्या चार दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात गारांसह अवेळच्या पावसाची हजेरी लागत असल्याने द्राक्षवेलींचे मोठे नुकसान होत असून खरड (एप्रिल) छाटणीनंतरचे नवीन फुटवेच गारांच्या तडाख्यात सापडून जमीनदोस्त होत असल्याने पुढील हंगामासाठी वांझ डोळय़ाचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्ष हंगाम संपल्यानंतर पाणी उपलब्धता पाहून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षाची खरड छाटणी केली असून वलांडय़ावर नवीन काडीसाठी कोंबही आले आहेत. मात्र, गेल्या आठवडय़ामध्ये तासगाव तालुययातील मांजर्डे, हातनुर, कवठेमहांकाळ तालुक्यात जाखापुर, कुची, गुरुवारी पलूस तालुक्यातील बुर्ली, नागठाणे, येळावी जत तालुक्यातील जालीहाळ, दरीबडची, पांढरेवाडीसह अन्य काही भागात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागामध्ये नवीन फुटवे असलेल्या कोवळय़ा काडय़ांचे नुकसान झाले आहे. काही बागांमध्ये सपकीन करण्यात आले असून नवीन फुटव्यांना गारांचा मारा सहन झाला नसल्याने कोवळय़ा काडय़ा मोडून पडल्या आहेत, तर पानेही फाटली आहेत. डोळय़ाच्या ठिकाणी गारांचा मारा बसल्याने काडीतील डोळय़ात द्राक्ष घड निर्मितीसाठी गर्भधारणा होण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे पुढील हंगामात वांझचे प्रमाण अधिक असण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. गारपिटीमुळे द्राक्ष हंगाम वांझ जाण्याची भीती असल्याने गारपीट झालेल्या द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.