अहिल्यानगर: श्रीरामपूरमधील हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी श्री. चित्ते यांच्या पत्नी दिपाली प्रकाश चित्ते व चिरंजीव प्रतीक प्रकाश चित्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित फिर्यादीने रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यात प्रकाश चित्ते यांचे नाव किंवा जातीयवाचक शब्दांचा उल्लेख नव्हता. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा दाखल केलेल्या दुसऱ्या फिर्यादीत, आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारातून प्रशासनावर राजकीय दबावा होता, कटकारस्थान होते हे स्पष्ट होते.
या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रकाश चित्ते हे पूर्वी भाजपचे पदाधिकारी होते. पक्षांतर्गत राजकीय वादातून गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या तक्रारीवरून न्यायालयात विरोधी साक्ष देऊ नये या कारणासाठी धमकावल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेत चित्ते यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली होती. आता हा खोटा गुन्हा दाखल केल्याच्या घटनाक्रमाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे.