वंचित बहुजन आघाडीने संविधान दिनाचं औचित्य साधत ‘संविधान सन्मान महासभे’चं आयोजन केलं होतं. या सभेतून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच सध्याचं सरकार संविधान बदलू इच्छित आहे, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आंबेडकरांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की, भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही. कुणालाच म्हणजे कुणालाच नाही. संविधानात तशी तरतूदच नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात. अर्ध्या लोकांचं ‘संविधान बदलणार’ असं सुरू होतं, तर अर्ध्या लोकांचं ‘मुंबई तोडणार’ असं चालू होतं. आता हे वारंवार ऐकावं लागेल. पण मुंबई कुणी तोडू शकत नाही, संविधान कुणी बदलू शकत नाही.”

हेही वाचा- “…त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

संविधान सन्मान महासभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या समर्थनार्थ ही चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस पक्षानेही येत्या कालावधीत दुसऱ्या राज्यात संविधानाची चर्चा सुरू करावी. सार्वजानिक सभा घ्याव्यात. काहीजण संविधान बदलू इच्छित आहेत. त्यांना माझं विचारणं आहे की, तुम्हाला संविधान का बदलायचं आहे? संविधान बदलण्याच्या अगोदर आपण ठरवतो की नवीन काय येणार आहे. पण एवढंच सांगितलं जातंय की हे संविधान आता जुनं झालंय. आता न चालण्यासारखं झालंय, म्हणून बदललं पाहिजे. त्यामुळे याचा विचार करणं आवश्यक आहे.