मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी केवळ राजकारण केलं असे लोक मला लक्ष्य करत आहेत. त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे, याला टार्गेट करा अशी त्यांची मानसिकता दिसते, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान केलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला, राज्य सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलेलं नाही. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जात असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले, महाराष्ट्रात जाती-पातीसंदर्भात अशी भाषा यापूर्वी कोणी केली नव्हती. महाराष्ट्राने बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्यासारखा मुस्लीम मुख्यमंत्री स्वीकारला आहे. दलित मुख्यमंत्री स्वीकारला आहे. या राज्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला. तेव्हाही महाराष्ट्राने त्या निर्णयाला विरोध केला नाही. कारण, महाराष्ट्रात कर्तबगारीला महत्त्वं आहे, जातीला नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे तो यासाठीच. महाराष्ट्र हा जात-पात, धर्म न मानता राजकारण समजाकारणात काम करतोय.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला आत्ताच का आठवलं की तुम्ही ब्राह्मण आहात. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तुम्ही पाच वर्षे राज्य केलंत, तेव्हा कधी मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केलं जातंय असं वक्तव्य तुम्ही केलं नाही. तुमची कारस्थानं उघड झाल्यानेच लोक तुम्हाला दूषणं देत आहेत. मी दूषणं म्हणेन, शिव्या हा शब्द वापरणार नाही. तुमची कारस्थानं उघड झाली, त्यामुळेच तुम्हाला आता वाटतं की, तुम्हाला टार्गेट केलं जातंय.

हे ही वाचा >> “शिंदेंचं मुख्यमंत्रीपद टिकवायला तोडगा, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शूर ब्राह्मणांना कायमच आदर मिळाला आहे. इथल्या लोकांनी नेहमीच त्यांचा गर्व बाळगला आहे. वीर सावरकर, चाफेकर बंधू, वासुदेव फडके हे सगळे ब्राह्मण होते आणि आम्ही त्यांची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळात ब्राह्मण होते. त्यांच्या सैन्यात ब्राह्मण होते. लढणारा शूर असतो, त्याला जात नसते. परंतु, कारस्थानांना नक्कीच जात असते.