Devendra Fadnavis : जन आक्रोश यात्रेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची आपल्याला कीव येते असं म्हणत टोलेबाजी केली होती. तसंच त्यांचा उल्लेख चोरांचे सरदार असाही केला होता. भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष असंही म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जनादेश चोर म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी काय विधान केलं होतं?

मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, दिल्लीत तुमचे बाप बसले आहेत तरीही भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही काढून टाकत नाही? देवेंद्र फडणवीस यांनी काही भ्रष्टाचार केला नाहीये असं गृहीत धरु मग तुम्ही भ्रष्ट लोकांवर पांघरुण का घालता? भाजपा म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाही. तसं भ्रष्ट मंत्र्यांच्या जागीही कुणी मिळत नाही का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं मला या लोकांना काढायचं आहे पण सहन होत नाही आणि सांगता येत नाही असा दबाव आहे. आमचं तर म्हणणं आहे की झुगारुन द्या सगळा दबाव. देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत असं काँग्रेसने त्यांना म्हटलं आहे. चांगला शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. ज्याला आता आपल्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षातल्या लोकांचा भारतीय संविधानावर विश्वास उरलेला नाही-फडणवीस

विरोधी पक्षातल्या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे, त्या निवडणूक आयोगाने यांना चार पत्रं दिली आणि सांगितलं तुम्ही जे बोलत आहात ते शपथेवर सांगा. आरोप करणारे लोक का जात नाहीत? त्यांची हिंमत का होत नाही? का पुरावे देत नाहीत? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत. जो पराभव होतो आहे तो सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची (काँग्रेस) अवस्था आहे. अशं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही उत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, मनाची चोरी करतो, त्यामुळे लोक आम्हाला मतदान करतात. उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली होती. उद्धव ठाकरे जनादेश चोर आहेत त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं हे आम्हाला शिकवावं यापेक्षा मोठं दुर्दैव काय? बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. कारण त्यांच्या चेल्या चपाट्यांनी कफन खरेदीतही चोरी केली. त्यातही पैसा कमावला. आता उद्धव ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

जन आक्रोश वगैरे काही नाही सत्ता गेल्याने मनातला आक्रोश आहे-देवेंद्र फडणवीस

महा जनाक्रोश वगैरे काही नाही हा त्यांच्या मनातला आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही म्हणून मनाक्रोश चालला आहे. असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.