राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना, आज अहमदनगरमध्ये एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य काहीजण जखमी झाले आहेत. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागल्याचं समोर आलं आहे. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 “अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.”

तसेच,  “या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.” असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत