राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी बंडखोरी केलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांमध्ये नाराजी दिसून आली होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीदेखील स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, लवकरच दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये नाराज नेत्यांसह भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते तथा पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याआधीही त्यांनी (पंकजा मुंडे) मंत्री म्हणून काम केलेलं आहे. भाजपा मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> संजय देशमुख यांनी हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; म्हणाले “तारीख ठरवा, मी…”

यापूर्वीही पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम केलेले आहे. मात्र यापुढे त्या कसे काम करतील याबाबत मला कल्पना नाही. मला हा प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनाच काम करायचे की नाही हा प्रश्न विचारायला हवा. भाजपा मला विचारून मंत्रीपदाची यादी ठरवत नाही. यादीत कोणाला स्थान दिले जावे, हे मला विचारले जात नाही. तसे असते तर मला फार आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

हेही वाचा >>> संजय देशमुख यांनी हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; म्हणाले “तारीख ठरवा, मी…”

धनंजय मुंडे यांनी राज्याील अतिवृष्टीवरही भाष्य केले. शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरत आहेत, हे माहिती नाही. शेतकरी संकटात असताना राज्यात सरकारचे अस्तित्त्वच दिसच नाही. विरोधी पक्ष या समस्येवर आवाज उठवत आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लेक्ष करत आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही, तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले आहे. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थाशिवाय त्यांना काहीही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.