बृहन्मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदासाठी ‘आयबीपीएस’द्वारे २५ नोव्हेबंर रोजी, तर जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी २५ व २६ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार आहे. यातील एकाच दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही परीक्षा होत असल्यामुळे उमेदवारांना कुठल्याही एकाच परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची अडचण होणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही परीक्षा इच्छुक उमेदवारांना देता याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या २४३ जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी व जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या ५०४ जागांसाठी २५ व २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कुठल्याही एकाच परीक्षेला बसता येणार आहे. तर एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील होतकरू अत्यंत बिकट परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यात प्रचंड बेरोजगारी वाढलेली असल्यामुळे रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधींचा लाभ प्रत्येकाला घेता यायला हवा, असे मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा जलसंपदा यापैकी एका विभागाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून उमेदवारांना दोन्हीही परीक्षांना बसता येईल, यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे अशी विनंती मुंडे यांनी पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.