प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून १५ मेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी  एच. के. जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आजरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जगन्नाथ विरकर, जिल्हा सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व जिल्हा कार्यालयाचे प्रमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक व आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात सादर करावी.  
 जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय १ जूनपासून मान्सूनच्या काळात सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगी घेऊनच मुख्यालय सोडावे, पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडल्याचे दिसून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. बोटीवरील नाखवांच्या दूरध्वनीची मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणांच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन तहसीलदार कार्यालयात सादर करावी, असे
 जिल्हाधिकारी यांनी या वेळी सांगितले. मान्सूनच्या काळात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या, तसेच सर्व विभागांनी त्यांच्या जिल्हास्तरीय नोडल ऑफिसर (संपर्क अधिकारी) नियुक्त करण्यात येऊन या कार्यालयास माहिती देण्यात यावी. प्रत्येक विभागाचा नियंत्रण कक्ष १ जूनपासून ते १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत २४ तास कार्यान्वित करण्यात यावा. नियंत्रण कक्षाचा संपर्क क्र. तसेच नियंत्रण कक्षासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावी, असेही या वेळी त्यांनी सांगितले. सर्व नगरपालिकांनी शहरातील गटारे / नालेसफाई करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवावा व रोग पसरू नयेत याची दक्षता घ्यावी. या बैठकीस सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.