संत ज्ञानेश्वर व नामदेव महाराज यांनी वैदिक परंपरेला नाकारले. शुद्रांना जागा नसलेल्या यज्ञ-यागावर टीका केली. पुरोगामी चळवळीत या संतांच्याबद्दल मतभिन्नता असली तरी त्यांनी बहुजनांच्या काळजात जागा निर्माण केली. शोषणाला तेही बळी पडले. त्यामुळे त्यांच्याबद्दल संतुलित विचार केला पाहिजे. समता व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत कृतज्ञता ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत  डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. अशा महामानवांना संप्रदाय, गट, जात व पंथांमध्ये बांधून ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
राहुरी येथे गाडगे महाराज आश्रम शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या विद्रोही साहित्य व सांस्कृतिक संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘जातीअंताचा लढा व ऐतिहासिक आढावा, पुढील आव्हाने’ या परिसंवादात डॉ. साळुंखे अध्यक्षपदावरून बोलत होते. परिसंवादात ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे, प्रा. प्रकाश शिरसाठ यांनी भाग घेतला. माणसे जोडून डोळसपणे जाती व वर्गाच्या विरोधातील संतुलित समाजव्यवस्था निर्मितीकरिता विद्रोही साहित्य व सांस्कृतिक चळवळीने काम करावे, अशी अपेक्षा डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केली.
डॉ. साळुंखे म्हणाले, वेदाला प्रामाण्य मानणारी यज्ञ-याग, चातुर्वण्र्याला स्थान देणारी वैदिक परंपरा व या परंपरेच्या विरोधातील दुसरा प्रवाह असे संस्कृतिचे दोन प्रवाह आहेत. पहिल्या परंपरेत मानवी स्वातंत्र्य व स्त्रियांचे अधिकार नाकारण्यात आले. दुसऱ्या परंपरेत यज्ञ यागाला विरोध करून मानवी बुद्धीला स्वातंत्र्य देण्यात आले. चार हजार वर्षांपासून दोन्ही संस्कृती एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैदिक प्रवाह क्लेशकारक व दु:खदायी आहे. पण बळीराजा, चार्वाक, भगवान महावीर, गौतम बुद्ध, नंतरच्या काळात ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, संत नामदेव, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कबीर, बसवेश्वर यांनी व आता गेल्या दीड दोनशे वर्षांत महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या महामानवांनी विषमता आणणाऱ्या चातुर्वण्र्याला नाकारले. माणसाची बुद्धी व त्याला स्वत्वाचे भान दिले. विद्रोही चळवळीच्या तत्वज्ञानाचे मूळ या महामानवांच्या विचारात आहे.
वारकरी संप्रदायातील संतांनी केलेल्या कामाबद्दल पुरोगामी चळवळीत मतभिन्नता आहे. पण ७०० वर्षांपूर्वी नामदेवांनी चोखोबाची समाधी विठ्ठल मंदिराच्या पुढे बांधली. ज्ञानेश्वरांनी वैदिक परंपरा नाकारली. शुद्रांना जागा नसलेल्या यज्ञ यागावर टीका केली. बहुजनांच्या काळजात त्यांनी जागा घेतली असल्याने काही लोक ज्ञानेश्वरांना नाव ठेवत नाहीत. नामदेवांची परंपरा पुढे तुकारामांपर्यंत अनेक संतांनी चालविली. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घ्यायला हवी. रवीदास, बसवेश्वर, संत कबीर, तसेच स्वामी विवेकानंद यांनीही असेच काम केले. विवेकानंदांच्या विचारांची मांडणी सध्या जशी होते आहे त्या स्वरुपात त्यांचे कार्य नव्हते. विषमतेच्या भेदाभेदाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली. त्यामुळे त्यांच्या संबंधी मांडणी करण्याचे काम नव्या पिढीने करावे, विद्रोही चळवळीतील ही पिढी अधिक चांगल्या प्रकारे हे काम करू शकेल, असा विश्वास डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला.
डॉ. सुहास फडतरे यांनी मनुस्मृतिच्या विरोधात वारकरी संप्रदाय लढला आहे. वारकरी हा खऱ्या अर्थाने विद्रोही आहे. मानवता धर्माची राखण त्यांनी केली. कबीर, नामदेव, तुकाराम, बसवण्णा हे मानवता धर्माचे गुरू आहेत, असे मत मांडले. डॉ. प्रकाश शिरसाठ यांनी जात हा हिंदू तत्वज्ञानाचा विषय नसला तरी व्यवहारात मात्र जाती आहेत असे सांगितले. भगवद्गीतेत जातीचे दर्शन दिसते. ती नाकारण्याचे काम भगवान बुद्धांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा विचार लोकांपर्यंत नेला. लोकांना आत्मभान दिले. पण त्यांची अवहेलना करण्यात आली. विद्रोही चळवळीने चातुर्वण्र्याविरूद्ध लढणाऱ्या महामानवांचा सन्मान करून त्यांच्या विचाराने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.