ग्रामीण भागातील आरोग्य संवर्धनाचा प्रयत्न

प्रशांत देशमुख, लोकसत्ता  

वर्धा : करोना काळातील टाळेबंदीने भाजीटंचाईच्या बसलेल्या झळा व याच काळात रोगप्रतिकारक शक्तीचे जाणवलेले महत्त्व अधोरेखित करीत ‘माझी पोषण परसबाग’ हा उपक्रम उदयास आला. जिल्हय़ातील अशा आठ हजारांवर पोषण परसबागा जिल्हय़ातल्या ग्रामीण भागाचे आरोग्य संवर्धन करण्यास पुरेशा ठरण्याची चिन्हे आहेत.

जिल्हय़ात परगावातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीमुळे शेकडो लोकांचा प्रवेश होत होता. लाल पट्टय़ातील धोकादायी क्षेत्रातून येणाऱ्या अशा व्यक्तींमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता हेरून बाहेरील जिल्हय़ातील भाजीपाला वाहतुकीस मनाई करण्यात आली होती. जिल्हय़ात जे पिकते त्यावरच स्वयंपाक आटोपण्याची कसरत गृहिणींना करावी लागली होती. काही प्रमाणात टंचाईसुद्धा जाणवली. अशा संकटाला सामोरे जाण्यासाठी स्वयंसिद्ध होण्याचा विचार उमेद अभियानातून पुढे आला. संकटाने शिकवलेला धडा जिल्हय़ात पोषण मूल्याचे महत्त्वसुद्धा सांगणारा ठरला. ‘उमेद’तर्फे  जिल्हय़ातील आठ तालुक्यात माजी पोषण परसबाग हा उपक्रम राबवण्याचे ठरले. २५ जून ते १५ जुलै या कालावधीत अशा आठ हजारांवर परसबागा तयार करण्याचे नियोजन अंमलात येत आहे. घराच्या सभोवताल तसेच ग्रामपंचायत व शाळेच्या मोकळय़ा जागेत या परसबागा ‘उमेद’च्या स्वयंसहायता समूहातील महिला फु लवणार आहेत. गरोदर स्त्रिया, लहान बालके व किशोरवयीन मुली यांना ग्रामीण भागात पुरेसा पोषक आहार मिळत नाही. आता ही तक्रार परसबागेच्या माध्यमातून दूर करण्याचा विश्वास व्यक्त होतो. या घटकांच्या आहारात विषमुक्त, ताजा आणि पोषक तत्त्वयुक्त भाजीपाला या माध्यामातून नियमित मिळेल. ‘रिलायंस न्यूट्री गार्डन’च्या संकल्पनेत काही बदल करीत ‘उमेद न्यूट्री गार्डन’ अस्तित्वात आल्याचे प्रकल्प समन्वयक अमोल पाटील यांनी सांगितले.

कमी जागेत व लवकर पिकणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, वेलवर्गीय, पपई, केळी याचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाणार आहे. गटाच्या महिला सदस्यांना हा भाजीपाला मोफ त मिळेल. शिल्लक असलेला शेजाऱ्याला दिला जाईल व अतिरिक्त उत्पादन झाल्यास त्याची गावपातळीवर विक्री करण्याची संकल्पना आहे. आठ तालुक्यातील ३२० गावात यास प्रारंभ झाला. घरातील सांडपाण्यावर परसबाग फु लवण्यास प्राधान्य आहे. गरोदर व स्तनदा माता यांना केंद्रस्थानी ठेवून पूरक पोषक आहार मिळेल. याच निमित्ताने वैयक्तिक व स्वयंपाकगृहातील स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. महिला गटांनी या पोषण बागा गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठराव्या, असा हेतू ठेवल्याचे अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांनी सांगितले. अधिकाधिक स्वयंसहायता गटातील महिलांनी पोषण परसबाग तंत्रज्ञान शिकण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे सार्वत्रिक तक्रार असते. ही तक्रार परसबागेच्या माध्यमातून कायमची दूर करण्याचा हेतू या उपक्रमातून ठेवण्यात आला आहे. एक हजार दिवसाच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात निकोप आरोग्य ठेवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांनी सांगितले.