शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार सध्या शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असून ही आतापर्यंतची शिवसेनेमधील सर्वात मोठी बंडाळी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय. वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेऊन आदित्य ठाकरे आपले म्हणणे मांडण्याबरोबरच बंडखोर आमदारांवरही टीका करताना दिसत आहेत. वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बाजू कार्यकर्त्यांसमोर मांडतानाच आदित्य ठाकरे हे बंडखोरांवर सडकून टीका करत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. अशाच एका मेळाव्यादरम्यान काल भायखळ्यामध्ये आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदार हे पूरपरिस्थिती असणाऱ्या आसाममध्ये मजा करत असल्याचं सांगताना या आमदारांचं एका दिवसाचं बील किती होतं यासंदर्भातील भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपाची तयारी?; फडणवीसांच्या घरी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना निर्देश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भायखळ्यामधील शिवसैनिकांसोबत संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांनी स्वत:चा सौदा केल्याचा आरोप केला. वेगवगेळी प्रकरणं समोर आल्याने आमदारांनी बंडखोरी केल्याचा दावा आदित्य यांनी केला. गुवाहाटीमध्ये आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरुनही त्यांनी टीका केली. “बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले आहेत. तिथे पूरपरिस्थिती असून त्या ठिकाणी अनेक नागरिक घर आणि अन्नपाण्याशिवाय आहेत. मात्र तिथे बंडखोर आमदार मजा करत आहेत. त्यांच्या एका दिवसाच्या जेवणाचं बील हे ९ लाख रुपये इतकं आहे. ते खासगी हेलिकॉप्टर्स घेऊन तिथे जात असून ऐश करत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे,” असं आदित्य म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “या आमदारांची वेगवेगळी प्रकरणं समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:चा कोट्यावधी रुपयांना सौदा केलाय,” असंही आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचे बंधूही गुवाहाटीला जाणार? सुनील राऊत म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी…”

शिवसेनेतील या बंडामुळे घाण निघून गेली आहे. बेइमान झालेल्यांना कदापि माफ करणार नाही; पण काही आमदारांना बळजबरीने नेण्यात आले आहे. असे जवळपास १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना पुन्हा शिवसेनेत घेऊ; पण फुटिरांचा निवडणुकीत पराभव करणारच, असा निर्धार यापूर्वीच्या अशाच एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आदित्य यांनी रविवारी व्यक्त केला. त्याच वेळी नाराजीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी नाराज नसल्याची ग्वाही दिली होती, असा दावाही आदित्य यांनी केला.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…”, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल; “लाज असती तर…” म्हणत बंडखोरांवर टीका

मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बंडाआधीच नाराजीबाबत विचारणा केली होती; पण त्या वेळी शिंदे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. ही गोष्ट मे महिन्यातील. महिनाभरातच शिंदे यांनी बंड केले. नाराज होते तर तेव्हाच का आपली भावना व्यक्त केली नाही? नंतर या लोकांनी गुजरातमध्ये जाऊन बंड केले. खरोखर यांच्यात ताकद, लाज, स्वाभिमान असता तर समोर येऊन त्यांनी बंड केले असते. महाराष्ट्रात लपायची हिंमत नाही म्हणून सुरतला पळाले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावलाय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde rebel mla group food bill is 9 lakh per day where flood affected people dont get to eat says aditya thackeray scsg
First published on: 28-06-2022 at 10:48 IST