कर्जत : तालुक्यातील डिकसळ येथील माजी सैनिक यांच्या गट नंबर ४३ मधील शेतजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण प्रशासनाने तातडीने दूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक त्रिदल संघटना व कर्जत तालुका आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच गावामध्ये या घटनेचा संघटनेच्यावतीने सैनिकांनी निषेध करत घोषणाबाजी केली. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील माजी सैनिक गुलाब नारायण पारे यांच्या पत्नीच्या नावे दोन एकर शेत जमीन आहे. मात्र या शेत जमिनीवर आसपासच्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे गुलाब पारे यांची दोन एकर क्षेत्रामधील वीस गुंठे जमीन कमी भरत आहे. त्याच गावातील बाळू राजाराम शिंदे यांनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार गुलाब पारे व महाराष्ट्र राज्य माजी सैनिक त्रिदल संघटना व आजी-माजी सैनिक संघटना कर्जत यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व भूमिअभिलेख कार्यालय या ठिकाणी केली आहे. या अतिक्रमण केलेल्या गट नंबर ४३ ची मोजणी पोलीस बंदोबस्तामध्ये भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी केली मात्र यामध्ये अनेक वेळा बाळू राजाराम शिंदे यांनी अडथळा आणला व त्यांनी हद्द कायम करण्यास विरोध दर्शवला. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप लगड हे बोलताना म्हणाले की माजी सैनिकांनी देशाच्या सीमांचे संरक्षण केले आहे. हे करताना त्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी या ठिकाणी लावली मात्र असे असताना त्यांची स्वत:ची शेतजमीन मात्र काहीजण बळकावत आहेत हा या सैनिकांवर अन्याय आहे. तो आम्ही कदापि सहन करणार नाही. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून तातडीने माजी सैनिक यांची शेतजमीन संपूर्णपणे त्यांना परत मिळवून द्यावी अन्यथा संघटना या प्रकरणी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा संदीप लगड यांनी दिला. यावेळी बोलताना कर्जत तालुका आजी-माजी संघटनेचे अध्यक्ष भाऊ साहेब रानमाळ म्हणाले की डिकसळ येथील माजी सैनिक गुलाब पारे यांच्यावर अन्याय झाला आहे. वास्तविक पाहता या समाजातील सर्व घटकांनी सैनिकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे कारण देशसेवा करताना आम्ही संपूर्ण भूमीच संरक्षण करतो मात्र गावांमध्ये आम्हाला आमच्या जमिनीपासून जागेपासून वंचित करण्याची घटना अतिशय संतप्त व संतापजनक आहे. यामुळे माजी सैनिक पारे यांना त्रास देणाऱ्या नागरिकांचा प्रथम आम्ही निषेध करतो व संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा संघटनेचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळे यांनी दिला आहे. यावेळी त्रिदल संघटनेचे शेषनारायण आठरे यांचेही भाषण झाले. यावेळी जिल्ह्यातील आजी-माजी संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.