लेखकांच्या मराठी साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित स्वरूपाचा असून, त्यात बदल करण्याची गरज आहे. मराठी साहित्य अधिक समृद्ध आणि व्यापक होण्यासाठी विविध क्षेत्रांतील कर्तबगार मंडळींनीही मराठी लेखन केले पाहिजे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.
मराठी साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा हुतात्मा स्मृतिमंदिरात डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. निशिकांत ठकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (झिम्मा- आत्मकथा), यशवंतराव गडाख (अंतर्वेध- व्यक्तिचित्रण) व प्राचार्य डॉ. महेंद्र कदम (आगळ- कादंबरी) यांना दमाणी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी व्यासपीठावर साहित्य पुरस्कार समितीचे निमंत्रक तथा ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, गिरिराज दमाणी व राजेश दमाणी उपस्थित होते. उद्योजक दमाणी कुटुंबीयांनी लक्ष्मीबरोबर सरस्वतीची सेवा या साहित्य पुरस्काराच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षांपासून चालविली आहे. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख संयोजक प्रेमरतन दमाणी व नवरतन दमाणी हे दोघे व्यासपीठाऐवजी प्रेक्षकांत बसले होते. तर व्यासपीठावर त्यांचे प्रतिनिधित्व दमाणी कुटुंबीयांतील चौथ्या पिढीने केले. राजेश दमाणी यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले.
डॉ. कोत्तापल्ले यांनी गेल्या २०-२५ वर्षांत भाषेच्या मुद्यावर होणारा संघर्ष चिंताजनक असल्याचे नमूद करीत हा संघर्ष आपल्याला कोठे घेऊन जाणार, याबद्दल आता विचार करण्याची गरज प्रतिपादन केली. जागतिकीकरण, उदारमतवादाच्या काळात समाज बदल असून अशा वेळी नव्या जाणिवा निर्माण करण्यासाठी व समाजात एकोपा व सुसंवाद होण्यासाठी साहित्य निर्माण व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराच्या मानकरी विजया मेहता यांनी आपले मनोगत मांडताना ‘झिम्मा’मागची भूमिका विशद केली. नव्या पिढीशी संवाद साधण्यासाठी झिम्माची निर्मिती झाली. तिच्या नावात लय, आनंद, एकत्रपण, खेळकरपणा असल्याने या आत्मकथेला ‘झिम्मा’ हे नाव दिल्याचे त्यांनी नमूद केले. पुरस्काराचा दुसरे मानकरी यशवंतराव गडाख यांनी चंगळवादाची लक्ष्मणरेषा समाज आज ओलांडत चालला असून, त्यामुळे घर आणि नाती विकलांग होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिक्षणाने माणूस आत्मकेंद्री होत असताना साहित्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. पुरस्काराचे तिसरे मानकरी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी ‘आगळ’ या कादंबरीत गावातून शहरात आलेल्या तरुणाची सामाजिक व कौटुंबिक संघर्षांची भूमिका चित्रित केल्याचे सांगितले. ग्रामीण लेखकांपुढे आज अनेक आव्हाने उभी असून यात प्रथम आपला शत्रू ओळखता आला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. कवी फ. मुं. शिंदे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. तर रामदास फुटाणे यांनी आभार मानले.