राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) नाशिक येथे सुरू झालेल्या ९४ व्या अ.भा.साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच, असेही सांगितले आहे.

“मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?” असं फडणवीस म्हणाले आहेत.

इतिहासाशी प्रतारणा करणारी कादंबरी ऐतिहासिक कशी? ; साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची स्पष्टोक्ती

तसेच, “अखिल भारतायी मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?” असा सवाल देखील फडणीसांनी केलेला आहे.

याचबरोबर “नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव!” असं देखील फडणवीस यांनी सांगितलं आहे.

पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून … –

तर, “या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. असंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे.